भिवंडी : मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स आणि ईगल संस्था यांच्यातर्फे आदिवासी व कातकरी महिलांसाठी गरिबी हटाव हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत लाभार्थींना शेळ्यांचे वाटप करून योग्य ते प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे या महिलांना अर्थार्जनाचा नवीन स्त्रोत उपलब्ध झाला आहे. मौजे चांग्याचापाडा येथे नुकताच असा प्रशिक्षण कार्यक्रम झाला.
‘माझगाव डॉक शिप’च्या सीएसआर फंडातून यासाठी निधी दिला जात आहे. ‘ईगल’तर्फे गरीब व दुर्बल घटकातील लाभार्थी निवडून त्यांना उस्मानाबादी जातीच्या प्रत्येकी तीन शेळ्यांचे वाटप केले जाते. आतापर्यंत शंभर कुटुंबात या शेळ्या देण्यात आल्या आहेत. मौजे चांग्याचा पाडा येथे संस्थेने सर्व महिला लाभार्थींचे एक दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण शिबिर घेतले.
या शिबिरात किन्हवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ. दिलीप धानके यांनी शून्य खर्चावर आधारीत शेळीपालन व्यवसाय कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेळ्यांच्या आहारासाठी घरगुती कडधान्ये, जंगलातील उपयुक्त वनस्पती व वेलवर्गीय भाजीपाल्याचा टाकाऊ पालापाचोळा यांचा आहारात कसा समावेश करावा याची सोप्या शब्दांत माहिती दिली.
‘ईगल’तर्फे आयोजित केलेल्या प्रत्येक शिबिरात डॉ. धानके आदिवासी महिलांशी संवाद साधून ‘सर्व स्त्रिया बुद्धिमान असून, त्यांना कुटुंब चालविण्याचे अर्थशास्त्र पुरुषांपेक्षा अधिक चांगले समजते,’ असे सांगून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. डॉ. धानके यांनी प्रशिक्षणातून आदिवासी महिलांमध्ये जाणीव जागृती करण्याचा विडा उचलला आहे; तसेच या शेळीपालकांना पशुवैद्यकीय सेवा आणि औषध पुरवठ्याबाबतही ते योगदान देऊन ‘ईगल’शी जोडले गेले आहेत.
संस्थेचे मुख्य संचालक डॉ. नीलरतन शेंडे यांनी शहापूर तालुक्यातील किमान एक हजार आदिवासी कुटुंबांना शेळीपालन व्यवसायातून उभे करण्याचा संकल्प केला आहे. अनेक गावांतून लाभार्थी निवडून या संस्थेने ‘गरीब हटाव’ उपक्रमात गरुडझेप घेतली आहे. या प्रशिक्षण शिबिराप्रसंगी ‘ईगल’चे प्रकल्प समन्वयक मनोज वाहणे, डॉ. सुनील भंडलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात ‘ईगल’चे कर्मचारी कल्पेश मोरे, परशु चवर, सुनील डांगळे, समीर पानसरे, श्रेयस भोईर आदी उपस्थित होते.